मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थितीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयावरून भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची तुलना थेट रात्रीस खेळ चालेमधील पांडूशी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करून उदय सामंत यांना ATKT च्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत आठवण करून दिली आहे. ‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परीक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय” असा खोचक टोला शेलार यांनी लगावला आहे.
तसंच, विद्यार्थी हित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा आहे, त्यामुळे लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्या, अशी आठवण शेलार यांनी सामंत यांना करून दिली.
दरम्यान, राज्यातील सरकार हे विद्यार्थी द्रोही सरकार आहे जवळपास साडे तीन लाख एटीकेटी आणि रिपीटर विद्यार्थ्यांना नापास करण्याचे पाप हे सरकार करत असून निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याच्यावर अभ्यास हे सरकार करत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
ॲानलाइन शिक्षण ही काळाची गरज आहे. हे खरं असले तरीही ॲानलाइन शिक्षणाबाबत राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे. त्याबाबत सर्वांचे विचार जाणून निर्णय घ्यावा, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली.

अधिक वाचा  मविआचा प्लान बी ‘चैत्यभूमी’वर राहुल गांधीचे अभिवादन असे ठरलं जागावाटप; उद्धव ठाकरेंनी नावही जाहीर केलं!