मुंबई : परराज्यात गेलेले मजूर शहरांकडे पाठ फिरवणार अशी भीती व्यक्त केली जात होती. परिणामी अनेक कारखान्यांमध्ये पुरेसं मनुष्यबळ नसल्याने काम करणे अवघड जात आहे. त्यातच गेल्या 4 दिवसांत परराज्यात गेलेले मजुर परतत असल्याची बाब समोर आली आहे.
गेल्या 4 दिवसात 20000 लोक परराज्यातून महाराष्ट्रात परतले आहे. कोरोनाच्या संकटामुळे परप्रांतीय मजूर आपआपल्या गावी परतले आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. आजपासून अनलॉक – 1 सुरू झाला असून येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 01094 क्रमांकाची रेल्वे काल 7 जून रोजी मुंबईत ठरलेल्या वेळेत पोहोचली. या रेल्वेने 594 प्रवासी मुंबईत आले. या प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. 3 जून ते 7 जून या चार दिवसात विशेष रेल्वेतून तब्बल 20000 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. तर पुण्यात 1200 प्रवासी उतरले आहेत.
ही आकडेवारी असली तरी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी स्थलांतरिक मजूर अद्याप परतले नसल्याचा दावा केला आहे. हे मजूर लवकर परण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारण लॉकडाऊननंतर मुंबईत पाऊस सुरू होईल, पावसात मजुरांना फारसे काम नसते. जे मजूर चालत गेले आहेत, ते काही काळ तेथे थांबून सर्व सुरळीत झाल्यानंतर शहरात दाखल होतील, असंही नसीम खान यांनी सांगितलं आहे. टीव्ही9 ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. दुसरीकडे मनसेने परप्रांतातून आलेल्या मजुरांची नोंद करुन ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या सर्व मजुरांची माहिती पोलीस ठाण्यात असावी व कामगार कायद्यानुसार काम व्हावं, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

अधिक वाचा  असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?