लॉकडाउन काळात मुंबई लोकलला तब्बल ३२८ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यातच लोकल केव्हा सुरू होणार याबाबतही स्पष्टता नसल्याने हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यार्डात उभ्या असलेल्या लोकलची देखभाल-दुरुस्ती करावी लागत असून, आदेश मिळताच लोकल सुरू करण्याची मध्य आणि पश्चिम रेल्वेची तयारी आहे.
लॉकडाउन शिथील करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक क्षेत्रांसमोर सध्या लॉकडाउन काळातील तोटा कसा भरून काढायचा, असा गहन प्रश्न आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलही लॉकडाउनमुळे पूर्णपणे बंद आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील ३००पेक्षा जास्त गाड्या उभ्या आहेत. यात १२ आणि १५ डब्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित लोकलदेखील यार्डातच आहे. लोकल प्रत्यक्ष धावत नसल्या, तरी यार्डात त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे या खर्चाचा भार रेल्वेवर पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लॉकडाउन काळात (मार्च ते ३१ मेपर्यंत) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील अर्थात मध्य आणि हार्बर लोकल फेऱ्या बंद असल्याने एकूण १६३.८२ कोटींचा, तर पश्चिम रेल्वेवरील धावणाऱ्या लोकल बंद झाल्याने १६४.२३ कोटींचा फटका सहन करावा लागला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
मुंबई लोकल आणखी किती काळ बंद राहणार, हे निश्चित नाही. त्यामुळे तोट्यात आणखी वाढ होणार आहे. प्रवासीभाड्यातून मिळणारे उत्पन्न हे मालवाहतुकीच्या तुलनेत कमी आहे. लोकल सुरू झाल्यानंतर भरपाई देण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यात ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’वर (एनएफआर) भर देण्याचा प्रयत्न असेल. यात लोकलमधील उद्घोषणांपासून ते स्थानकांतील जाहिराती अशा सर्व बाबींचा समावेश असेल, असे रेल्वे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
८०० श्रमिक विशेष रवाना
लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यांतील श्रमिकांसाठी गुरुवार, ४ जूनअखेर ८०२ श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक ४२३ गाड्या उत्तर प्रदेशसाठी आणि १९३ गाड्या बिहारसाठी रवाना करण्यात आल्या.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला