संयुक्त अरब अमिरातीमधील संशोधकांना (युएई) शारजा येथील शेतजमीनीवर तांदाळाचे पीक घेण्यात यश आलं आहे. या यशस्वी प्रयोगानंतर युएईमधील भविष्यामधील अन्नधान्य निर्मितीसंबंधातील क्षेत्रासाठी हे महत्वाचे पाऊल असून देशाबरोबरच वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अशाप्रकारे पीक उत्पादन घेण्यासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेतले जातील असं हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. वाळवंटामध्ये पीक घेत तांदूळ उत्पादनामध्ये युएईने आत्मनिर्भर होण्याकडे हे पहिलं पाऊल टाकलं असून यासंदर्भातील वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे.
देशामध्ये पहिल्यांदाच तांदूळ उत्पादन घेण्याचा हा प्रयोग हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अल धयाद येथील संशोधन केंद्राच्या मदतीने राबवण्यात आला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तांदळाचे बियाणे पेरण्यात आले होते. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या या उत्पादनामध्ये पिकांनी १८० दिवसाचा काळ नुकताच पूर्ण केला.
धान्याचे बी कसा प्रतिसाद देत आहे यासंदर्भातील निरिक्षण करणे त्यावर देखरेख ठेवणे आणि त्यासंदर्भातील नोंदणी सुलभ करण्यासाठी ज्या भागामध्ये पीक घेण्यात आलं त्याचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन केले गेले. पहिला तुकड्यातील तांदूळ पाच मे रोजी, दुसऱ्या तुकड्यातील १० मे रोजी आणि तिसऱ्या तुकड्यातील ३० मे रोजी काढण्यात आला. या प्रयोगिक तत्वावर घेण्यात आलेल्या उत्पादनाचा सकारात्मक परिणाम दिसून आलं आहे. एक हजार चौरस मीटर (१० हजार ७६४ स्वेअर फूट) परिसरामध्ये ७६३ किलो तांदळाचे उत्पादन घेण्यात आलं.
असेमी (जपोनिका) प्रजातीच्या तांदाळाचे पीक घेण्यात आल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. या तांदळाची लागवड चीन, जपान आणि कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. लांब दाण्याच्या हा तांदळाचा वाण एफएल ४७८ नावाने ओळखला जातो. भारतात या तांदळालाच बासमती म्हणून ओळखलं जातं.
उष्णता, खारटपणा आणि मातीची कमतरता सहन करण्याच्या क्षमतेमुळे प्रकल्पावर काम करणाऱ्या तज्ञांनी तांदूळातील दोन वाणांची निवड केली होती असं माहिती हवामान बदल आणि पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. पाणीटंचाईच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तसेच पिकांसाठी लागणारा खर्च व पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधकांनी भूमिगत ठिबक सिंचन यंत्रणेच्या माध्यमातून हे पीक घेतलं आहे. पीक घेण्यात यश आलं असलं तरी दर्जासंदर्भातील चाचण्या केल्यानंतरच हा व्यवसायिक वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरिया आणि युएईमधील संशोधकांनी एकत्रितपणे काम करुन वाळवंटामध्ये बासमतीचे पिकं घेण्याचा चमत्कार करुन दाखवल्याचंही मंत्रालयाने सांगितलं आहे.

अधिक वाचा  धाराशिव लोकसभेत 400 पेक्षा जास्त उमेदवार? प्रशासन अलर्ट मोडवर, गठीत केली समिती