मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याशिवाय ही रक्कम जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्वीट केलं. सध्या सोशल मीडियावर अनुरागचं हे ट्वीट गाजत असून अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. अनुरागने ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘जे १५ लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचले नाहीत. ते साठवूनच हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून आजच्या दिवसासाठीच ते पैसे साठवले होते.’ अनुरागच्या या ट्वीट अनेकजण आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एवढंच नाही तर त्याने पुढे लिहिलं की, ‘आता हे पॅकेजही पुढे भविष्यात जोडलं जाईल आणि असंच जोडून जोडून आपण ५ ट्रिलियनपर्यंत सहज पोहचू. याला म्हणतात दूरदर्शीपणा. इंग्रजांसाठी विझनरी.’ याशिवाय अनुरागने अजून एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ‘काहीही असलं तरी प्रभूंनी एक गोष्ट योग्य सांगितली, ती म्हणजे आत्मनिर्भर व्हा. नाही तर काहीही होणार नाही. प्रभूच्या विश्वासावर तर काहीच होणार नाही.’ सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप निर्भीडपणे आपली मतं मांडत असतो. त्याचे अनेक ट्वीट हे सद्य सरकारच्या विरोधात असतात.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज भारताच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचं त्यांनी सांगितलं. या पॅकेजच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या भागातील आर्थिक व्यवस्था सुधारायला बळ मिळेल असं ते म्हणाले. या पॅकेजमुळे देशाचा विकास होण्यास आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळेल असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  मोहिते पाटलांचा विद्रोह अन् प. महाराष्ट्र 10 जागा गणितच बिघडले…; खास विमानानं टीम देवेंद्र नागपुरात दाखल