गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत असताना गेल्या चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश व राज्ये आत्तापर्यंत करोनामुक्त राहिलेली आहेत. शनिवारी ८६ हजार चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून ती प्रतिदिन ९५ हजार झाली आहे. दिल्लीसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
दिवसागणिक देशात करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. मागील २४ तासांत तब्बल ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढून ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, देशात करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही तितक्याच झपाट्याने वाढत आहे. भारतातील करोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली.
करोनाचे रुग्ण वाढत असले तरी समूह संसर्ग झालेला नाही. करोनाचे अनेक रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या विभागांमध्ये घराघरांत जाऊन चाचणी घेणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?