नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून तो १७ मे रोजी संपणार आहे. पण हा लॉकडाऊन १७ मेनंतरही सुरू राहणार की सरकार काही पाउल उचलणार आहे? सरकार आता पूर्ण जिल्हा किंवा शहरात निर्बंध न घालता फक्त हॉटस्पॉट असलेले भाग सील करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कंटेन्मेंट झोन वगळून उद्योग- व्यवसायांना सरकारने परवानगी दिलीय. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारने याशिवायही आणखीही काही निर्णय घेतले आहेत. यात उत्पादन आणि किरकोळ विक्रीचा समावेश आहे. काही राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या भागांवर निर्बंध घातले आहेत. यामुळे मजुरांच्या कमतरतेने आर्थिक उलाढाल सुरू झालेली नाही. मजुरांअभावी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी मालाची वाहतूक रोडावली आहे. लॉकडाऊन पूर्वी २२ लाख ई-वे बिल भरले जात होते. आता ही संख्या ६ लाखांवर आली आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला ही संख्या फक्त ३.२ लाख इतकी होती. गेल्या तीन आठवड्यात त्यात दुप्पाट वाढ झाली आहे.
देशातील काही भागांमध्ये करोनाचा धोका वाढताना दिसतोय तर काही ठिकाणी हा धोका नियंत्रणातही आलाय. तसंच गोवा, मिझोराम ही राज्य करोनामुक्त झालीत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी ३.०० वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही चर्चा पार पडणार आहे. देशात करोनाशी निगडीत वेगवेगळ्या मुद्यांवर ही चर्चा पार पडणार आहे. तेलंगणने २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. अजूनही काही राज्य लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहेत. यामुळे सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.
देशातील करोना रुग्णांची संख्या ६२९३९ इतकी झाली आहे. आतार्यंत २१०९ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर १९३५८ जण करोनामुक्त झालं आहेत. गेल्या पाच दिवसांत करोना रुग्णांची संख्या ४० हजारांवरून वाढून ६० हजारांवर गेली आहे. यामुळे राज्यांची चिंता वाढली आहे

अधिक वाचा  लातूरच्या विकासासाठी ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू…’ देशमुख