करोनामुळे देशातील स्थिती बिकट झाली आहे. करोनाचा प्रसार थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक संकटानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे लोकांचा जीव आणि अर्थव्यवस्था अशा दोन आघाड्यांवर सरकारची चिंता वाढली आहे. या संपूर्ण चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या (११ मे) बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्माण झालेल्या स्थितीला तोंड देण्याबरोबर लॉकडाउनच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लॉकडाउन वाढणार की आणखी दुसरा निर्णय घेतला जाणार हे स्पष्ट होणार आहे.
देशातील अनेक जिल्ह्यातून करोना हद्दपार झाला असला, तरी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह उद्योगांची केंद्र असलेल्या शहरांना करोनानं वेढा दिला आहे. या शहरांमधील करोनाचं संकट अधिक गडद होत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यात तिसऱ्यांदा वाढवलेल्या लॉकडाउनची मुदत जवळ येत असून, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. उद्या (११ मे) दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार आहे.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. सध्या देशात महाराष्ट्र, गुजरातसह सहा ते सात राज्यातील स्थिती काळजी करण्यासारखी आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे या बैठकीत या महत्त्वाच्या राज्यांतील स्थितीवर चर्चा होऊ शकते. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पाचवी बैठक आहे. या बैठकीनंतर जून पर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट