नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढतो आहे. गेल्या 24 तासांत 3390 कोरोना रुग्ण आढळले असून देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 56 हजारांवर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 56 हजार 342 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात 37 हजार 916 जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 103 जणांचा मृत्यू झाला असून देशातील मृतांचा आकडा 1886 वर पोहचला आहे. तर 16 हजार 540 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट 29.35 टक्के आहे.
दिल्लीत कोरोना संक्रमितांची संख्या 4 हजार 898वर पोहचली आहे. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातलं असून आतापर्यंत 14 हजार 541 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मुंबईत 583 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 सुरु असून 17 पर्यंत असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर कंन्टेमेंट झोन वगळता इतर भागात काही दुकानं अटी-शर्तींसह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जगभरात 71 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात 38 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात आतापर्यंत 2 लाख 70 हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.