मुंबई : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. ‘ कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आज कोरोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात.’ अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सुचना करणे असा असतो’, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘आपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही. मात्र, मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र, बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘केंद्रीय संस्था, लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आम्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्समध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे’, अशी विनंतीही त्यांनी केली.
पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती – उपमुख्यमंत्री
‘ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. 25 हजार मेट्रिक टन ज्वारी आणि 15 हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे’, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आमच्याकडून राजकारण होणार नाही – फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सुचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे, असं सांगितलं. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल, असे सांगितलं.
कोविड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णाना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्वाचे आहे, असे सांगितलं. केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे, असे ते म्हणाले.
‘आपली अर्थव्यवस्था सुरू करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केले.
परराज्यातील कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी – राज ठाकरे
कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल. पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना, उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसंच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सुचना द्यावी, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरू कराव्या – हितेंद्र ठाकूर
बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले की, ‘पालघर रेड झोनमध्ये आहेत. पण याठिकाणी आदिवासी भाग आहे त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. बांधकामे बंद आहेत. पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल. सकाळ,संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरू झाल्या पाहिजेत राज्य शासनाचे काम चांगले सुरू आहे.’ असेही ते म्हणाले.
कोणाचाही पगार कपू नका – प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पिक शेतकऱ्याच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्या, कोणाचाही पगार कपू नका. रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठीत करावेत. दुकाने उघडायला लावली आहेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजेत, ही मागणी त्यांनी केली. परीक्षा होणार की नाही ते स्पष्ट करावे, कुंभार समाजाकडे मातीचे रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळावा’, असे ते म्हणाले.
दारू विक्रीचा निर्णय चुकीचा – जलील
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यावेळी म्हणाले की, ‘नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष करणे सुरू आहे. औरंगाबादमधील तीन मोठ्या खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. अधिकाऱ्यांत समन्वय अभाव आहे. मनपातर्फे ४ कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधण्यात आले आहे. पण, तिथे काम करण्यासाठी मुंबईच्या तुलनेत अतिशय कमी पगार असल्याने विशेषज्ञ डॉक्टर्स तयार नाहीत. १४ कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे पण मनुष्यबळ नाही. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड्स नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही, असेही ते म्हणाले. दारू दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे सांगून जलील यांनी आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत’, अशी ग्वाहीही दिली.

अधिक वाचा  महापालिकेचा आत्ता ॲम्बेसिडरला बाय-बाय; पर्यावरणपूरक या गाड्या सेवेत दाखल होणार