सलग तिसऱ्यांना लॉकडाउन वाढविल्याने मुंबई, ठाणे परिसरातील परप्रांतीयांचे लोंढे दररोज मुंबईतून बाहेर पडत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातील कामगारांवर करोनामुळे उपासमारीचे सकंट कोसळले आहे. त्यामुळे यापुढे आयुष्यात परत मुंबईला जाणार नाही, मुंबईपेक्षा आपला गावच बरा असे म्हणण्याची वेळ या मजुरांवर आल आहे. मुंबई येथून पायीच गावाकडे निघालेल्या या मजुरांचे लोंढे मुंबई-आग्रा महामार्गावर दिसत आहेत.
लॉकडाउनमुळे या कामगार, मजुरांना रणरणत्या उन्हात उपाशीपोटी पायपीट करायची वेळ आली आहे. ओझर शहाराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावरून जाताना हे मजूर दिसत आहेत. देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या परप्रांतीय नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी थोडी सवलत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईहून निघालेले हे मजूर मध्य प्रदेश, इंदूर, पंजाब, इलाहाबाद, राजस्थान जाण्यासाठी पायीच निघाले आहेत. या परप्रांतीयांना नाशिक शहर पोलिसांनी शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर दूर जाऊन थांबा असे सांगितल्याने या मजुरांनी ओझर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावरील सायखेडा फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली तात्पुरता निवारा घेतला आहे.
पुलाची सावली ठरतेय आधार
जवळपास दोनशे नागरिक येथे थांबले आहेत. या पुलाखालची सावलीच त्यांच्यासाठी आधार ठरत आहे. हे लोक खूप घाबरलेले आहेत. एखादे वाहन मिळेल आणि आपला प्रवास सुखाचा होईल, घरी लवकर पोहचता येईल, अशी आशा त्यांना आहे. ‘आम्हाला फक्त आपल्या घरी जायचं आहे’, एवढेच ते सांगतात. ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन त्यांना बिस्कीट पुडे, पाणी देत आहेत.

अधिक वाचा  शिवसेनेतून बाहेर पडणार का? विजय शिवतारेंचं मोठं विधान; म्हणाले, होय त्यांना…