नवी दिल्लीः करोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांवर गेली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणाचे २४ तास काम सुरू आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, आत्यावश्यक सेवेती कर्मचारी असे अनेक विभाग काम करत आहेत. पण करोनाचे रुग्ण वाढत आहे. रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. यामुळे करोनाचे रुग्ण कधी कमी होतील असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आरोग्य मंत्रालयाने याचं उत्तर दिलं आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि सर्व नियमांचे पालन केल्यास करोनाचा प्रादुर्भाव थांबून साखळी तुटेल. असं झाल्यास जिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत तिथे २८ दिवसांत नवीन रुग्ण आढळलाच नाही तर करोनाची साखळी तुटली असं स्पष्ट होतं, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.
दरम्यान, देशातील विविध राज्यांमध्ये फक्त करोना रुग्णांसाठी ६०२ हॉस्पिटल तयार करण्यात आले आहेत. यात १ लाख ०६ हजार ७१९ बेड आहेत. तर १२ हजार ०२४ आयसीयू बेड आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील करोना रुग्णांची संख्या १०३६३ वर. गेल्या २४ तासांत १२११ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या वाढून ३३९ इतकी झाली आहे. तर १०३६ जण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १७९ जणांना उपचारांनातर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली.