११ एप्रिल २०२० रोजी महात्मा जोतीराव फुले यांची १९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तमाम भारतीयांना आदर वाटतो. त्यांच्या नावावर अनेक पक्ष, संघटना, प्रतिष्ठानं चालतात. मात्र अवघ्या १५० वर्षांपुर्वी चित्र याच्या नेमकं उलटं होतं. होय, त्यावेळी या राष्ट्रपुरूषाची आठवणही कोणाला नव्हती. अशावेळी शिवाजी महाराजांवरचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं. १८०६ सालापासून मराठी [ देवनागरी ] छापखाना सुरू झाला.

१८०६ साली विल्यम कॅरेचं पहिलं मराठी पुस्तक छापण्यात आलं. [ ग्रामर ऑफ मराठा लॅण्गवेज, grammar of maratha language ] तेव्हापासूनचा इतिहास शोधून पाहा. मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक जोतीरावांचं आहे. जून १८६९ मध्ये ते प्रसिद्ध झाले.

मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील [ नंतरची गंज पेठ व सध्याची महात्मा फुले पेठ ] पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलेले होते. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती. हे पुस्तक जोतीरावांनी परमहंस सभेचे अध्यक्ष दिवंगत रामचंद्र बाबाजी राणे यांना अर्पण केले होते. शिवराय एव्हढे मोठे होते की ते अमक्याएव्हढे मोठे होते अशी इतर कोणाची त्यांना उपमा द्यायची असेल तर दुसरी व्यक्तीच उपमेला समोर दिसत नाही इतके महाराज मोठे होते, असे फुले या पोवाड्यात सांगतात. छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी भरभरून आदर व्यक्त करून तेच आपली कार्यप्रेरणा आहेत असेही जोतीराव सांगतात. सुमारे एक हजार ओळींचा हा प्रदीर्घ पोवाडा आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या व मी संपादीत केलेल्या महात्मा फुले समग्र वाड्मयात तसेच इंटरनेटवरही हा पोवाडा उपलब्ध आहे. [ लिंक खाली दिली आहे.]

सदर पुस्तकाच्या लेखनासाठी आपले ब्राह्मण बालमित्र भांडारकर यांनी आपल्याला सहकार्य केले अशी कृतज्ञतापुर्वक नोंद जोतीरावांनी प्रस्तावनेत आवर्जून केलेली आहे. ” ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी जोती म्हणे!”   हेच तर त्यांचे ब्रीद होते. हे शिवचरित्र लिहिण्यासाठी जोतीरावांनी अनेक संदर्भ साधनांचा धांडोळा घेतला. मराठीतील विविध बखरी, फारशीमधील तवारिखा, इतिहास ग्रंथ, इंग्रजी भाषेतील नानाविध ऎतिहासिक पुस्तके यांचा सखोल व्यासंग करून मोठ्या तयारीनिशी जोतीरावांनी हा ग्रंथ सिद्ध केला. गेली १५१ वर्षे तो सर्वत्र उपलब्ध आहे. किती शिवप्रेमींनी तो वाचलाय? उलट बहुतेक सगळेच उच्चभ्रू शिवचरित्रकार आणि शिवशाहीर या पुस्तकाची ठरवून उपेक्षा करतात.

” अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेतायुगी !१!
स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अनिवार देशासाठी !२!”

शिवराय देशासाठी लढत होते असे सांगणारे पहिले इतिहासकार, शिवशाहीर महात्मा जोतीराव फुले होत. त्यांना हा मान का नाकारला जातो?

हा चरित्रपर पोवाडा असल्याने यात तोवर उपलब्ध असलेल्या सर्व ऎतिहासिक संदर्भांचा त्यांनी वापर केलेला आहे. यात इतिहास असला तरी तो कोरडा, नीरस नाही. त्यात रसरशीत काव्य आहे. जोतीरावांच्या प्रतिभेचा आणि धगधगत्या शिवनिष्ठेचा हा ताम्रपट आपणही एकदा वाचावा. मी गेली ३२ वर्षे या पुस्तकावर बोलतोय. लिहितोय. मराठीत शिवरायांवर अनेक चरित्रपर आणि ललित पुस्तकं उपलब्ध आहेत. सत्यशोधक कृ. अ. केळुसकर, नरहर कुरूंदकर, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, वसंत कानेटकर, सेतुमाधव पगडी, दि. वि. काळे, वा. सी. बेंद्रे, गजानन भास्कर मेहेंदळे, गोविंद पानसरे, जयसिंगराव पवार आणि इतर अनेकांनी आपापले शिवछत्रपती मांडले. प्रत्येक विचारी माणसाने आवर्जून वाचावीत अशी ४ शिवचरित्रं निवडायची असतील तर म. फुले, केळुसकर, दि. वि. काळे आणि सेतुमाधवराव पगडी यांची निवडावी लागतात.

अधिक वाचा  सरळ आहे तो पर्यंत सरळ, कोणी वाकडे पाऊल टाकले तर…, पवारांच्या सभेचा टीझर; तरुणाईने ठेवले status 

बहुजन समाजाला एक महानायक, महापुरूष देण्याचा जोतीरावांचा उद्देश होता. कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर ५ गोष्टींची गरज असते.

१. आदर्शपुरूष वा स्त्री, जिच्या पावलावर पाऊल टाकून प्रगती करण्याची प्रेरणा सामान्य माणसाला मिळेल.

२. कार्यक्रमपत्रिका, परिवर्तनाचा कृतीकार्यक्रम, [ जोतीरावांनी ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, जातीनिर्मुलन, धर्मचिकित्सा, नैसर्गिक संसाधनांचे फेरवाटप ही विषयपत्रिका दिलेली होती.]

३. संघटना- सुरूवातीला शिक्षण संस्था आणि नंतर सत्यशोधक समाजामार्फत संघटित कार्य जोतीरावांनी केले.

४. नेतृत्व- जोतीराव, सावित्रीबाई यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही चळवळ पुढे लहुजीवस्ताद साळवे, ना.
मे. लोखंडे, कृ. पां. भालेकर, ताराबाई शिंदे, डॉ. विश्राम रामजी घोले, तान्हुबाई बिर्जे, धोंडीराम कुंभार, सावित्रीबाई रोडे, गंगाधरभाऊ म्हस्के, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षि वि. रा. शिंदे, राजर्षी छ. शाहू महाराज, भास्करराव जाधव, गोपाळबाबा वलंगकर, केशवराव विचारे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सी. के. बोले, कृष्णाजी अर्जून केळूसकर अशा असंख्य मान्यवरांच्या सहभागाने आणि नेतृत्वाने मोठी होत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिला वैश्विक उंची प्राप्त करून दिली.

५. तत्वज्ञान- जोतीरावांनी सनातन संस्कृती नाकारून पर्यायी भारतीय संस्कृती निर्माण करण्याचे सत्यशोधकी तत्वज्ञान विकसीत केले.

हा ग्रंथ लिहिताना शिवरायांच्या इतिहासाच्या माध्यामातून वरिल सगळी उद्दीष्टे गाठण्यासाठी जोतीरावांनी मांडणी केलेली आढळते.

शहाजी महाराजांना विजापूरमध्ये कैद करण्यात आले तेव्हा शिवरायांच्या पत्नी सईबाई वयाने खूप लहान होत्या. शिवराय अडचणीच्या प्रसंगी आपल्या या पत्नीशी विचारविनिमय करीत असत हे नागरिकांच्या मनावर बिंबवण्यासाठी फुले सांगतात, ” सईबाईंनी मसलत सुचवली, तसे महाराज वागले आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली.” ऎतिहासिकदृष्ट्या हे खरे की खोटे हे महत्वाचे नाही. आपल्या आदर्शांचे अनुकरण समाज करीत असतो आणि म्हणून आदर्श काय करीत होते हे लोकांपुढे उलगडऊन दाखवणे गरजेचे असते. बहुजन समाजात स्त्रियांचा सन्मान वाढवायचा असेल तर शिवाजी महाराज असे करायचे तुम्हीही करा हे सांगण्याचा यामागचा हेतू उघडच दिसतो. शिवाजीमहाराज हे आपले तमाम भारतीयांचे आदर्श होत हे पटवून देणारे फुले पहिले.

या पोवड्यात अशा कितीतरी जागा अहेत की ज्यांची विस्तृत चर्चा पुढे कधीतरी करता येईल.

शिवरायांच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख रेखाटताना जोतीराव म्हणतात,
“सोसिले उन्हातान्हाला भ्याला नाही पावसाला
डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला
लढवी अचाट बुद्धीला आचंबा भुमीवर केला
बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला
वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला!”हे पुस्तक लिहून आणि प्रकाशित करूनच जोतीराव थांबले नाहीत. त्यांनी शिवचरित्रावर व्याख्याने द्यायचा,पोवाडे गायचा धडाका लावला. १८८० साली जोतीराव रायगडावर गेले. महाराजांच्या समाधीची त्यांनी पुजा केली. पुण्यात येऊन स्वारगेटजवळच्या हिराबागेत [ शिवाजी मराठा शिक्षण संस्थेजवळ]  गंगारामभाऊ म्हस्के [ मराठा ] आणि चाफळकर स्वामी [ ब्राह्मण ] या मित्रांच्या सोबत सत्यशोधक समाजातर्फे पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. तिथून ही जयंती मुंबईला लालबाग परळला रावबहादूर लोखंड्यांनी नेली. त्यानंतर १५ वर्षांनी लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला हजेरी लावली. इतिहास लिहिणार्‍या उच्चभ्रूंनी मात्र शिवजयंतीचे सगळे श्रेय एकट्या टिळकांना देऊन टाकले. खरा इतिहास सांगतो, शिवजयंती सुरू महात्मा फुल्यांनी केली होती, लो. टिळकांनी ती पुढे नेली. टिळकांचे नातू जयवंतराव टिळक यांना याचे भान होते. त्यामुळे आपल्या आत्मचरित्रात टिळकांनी ती सुरू केल्याचा दावा न करता त्यांनी ती पुढे आणली अशी कबुली जयवंतराव देतात.

अधिक वाचा  संविधान बदलण्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट उत्तर

फुल्यांच्या रायगड भेटीच्या आणि शिवजयंतीच्या बातम्या तत्कालीन केसरीने जरी दिल्या नसल्या तरी दिनबंधूने त्या दिलेल्या आहेत. दिनबंधूच्या जुन्या फायलींमध्ये आजही त्या आहेत. शिवाय माधवराव बागल, वि. द. घाटे, फुले चरित्रकार, पं. सी. पाटील, धनंजय कीर, आचार्य अत्रे, मुकुंदराव पाटील, केळुसकर, जेधे, जवळकर, प्रबोधनकार, पाळेकर, श्रीपतराव शिंदे आदी मान्यवरांनी त्याच्या नोंदीही केलेल्या आहेत. तरिही काही सनातन्यांना म्हणे हे पुरावे मान्य नाहीत. का तर केसरीत तशी नोंद नाही ना! हे नासक्या आमराईतले रेशीमकिडे हा व्हायरस भयंकर आहे. त्यांचे मानायचे तर केसरीने जोतीराव व सावित्रीबाई यांच्या मृत्यूच्या बातम्या ज्याअर्थी दिलेल्या नाहीत त्याअर्थी ते वारलेच नाहीत असेही मानावे लागेल!

हा अफवाबाज विषाणू सातत्याने बुद्धीभेदाचा रणगाडा चालवित असतो. बहुसंख्य बहुजन तिला बळी पडत असतात. जातीविद्वेशाने सडलेल्या या प्रतिगामी मेंदूंनी आजपर्यंत जोतीरावांच्या या आद्यशिवचरित्राची वा जयंतीकार्याची दखलच घेतलेली नाही. याउलट जोतीरावांच्या अन्य लेखनातल्या नोंदी संदर्भापासून तोडून, विकृत करून जोतीरावांनी शिवरायांची बदनामी केलीय अशा आवया यांनी उठवल्या. आजही हाच उद्योग चालू आहे. १८६९ पर्यंत शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले एकही पत्र उपलब्ध झालेले नव्हते. स्वाभाविकच उपलब्ध ऎतिहासिक कागदपत्रांच्या आधारे शिवरायांचे औपचारिक शिक्षण झालेले नसावे अशा समजुतीने त्या अर्थाची नोंद जोतीरावांनी केली. मात्र अफवागॅंगकडून हा एकच शब्द तेव्हढा निवडून विकृतपणे पेश केला जातो, आणि फुलेबदनामीचे दुकान चालवले जाते. एखाद्या लेखकाचा एखादा सुटा शब्द नुसता बघून उपयोग नसतो तर त्याचा काळ, संदर्भ, हेतू आणि त्या लेखकाचे इतर लेखन हे सारे एकत्रितपणे बघावे लागते. अंडरवर्ल्डच्या टोळ्या जशा देशासाठी घातक आहेत तशाच या अफवागॅंग समाजशत्रू होत.

आर.एस.एस.चे स्वयंसेवक बाळ गांगल हे डबल पीएच.डी. होल्डर यात आघाडीवर होते. त्यांचा बुरखा मी ३२ वर्षांपुर्वीच माझ्या “महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन ” या ग्रंथात सप्रमाण फाडला होता. हिंदुत्ववादी बेहर्‍यांच्या सोबतमध्ये गांगलांनी १९८८ साली महात्मा फुल्यांवर भयंकर गरळ ओकलेली होती. फुल्यांनी शिवरायांची बदनामी केल्याचा धादांत खोटा आरोप गांगलांनी केलेला होता. आजही काही सडक्या आंब्यातले किडे हीच गोबेल्सची मोहीम चालवित असतात. देव, धर्म, देश यांचे नाव घेत बहुजनांचा बुद्धीभेद करून इतिहासाचा गैरवापर करीत ही विषवल्ली फोफावत राहते.

म्हणूनच संदर्भसाधनांच्या शोधात सतत राहावे लागते, त्यांच्या प्रकाशात इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. संदर्भसाधनांचा शोध आणि सत्यशोधन ही सतत चालणारी प्रक्रीया आहे. ती अथकपणे सुरूच ठेवावी लागेल. बहुजनांना या कामात फारसा रस नसतो. वाचन, चिंतन, संशोधन यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. अर्थात तशी गोडीही नसते. ते प्रतिगामी विद्वानांना रखेल्या ठेवाव्यात तसे आपल्या पदरी ठेवतात. हे बाळगलेले कावेबाज सनातनी इतिहासाचा विपर्यास आणि विकृतीकरण यात तरबेज असतात. प्रबोधन, परिवर्तनपर उपक्रमांना अदखलपात्र मानणे हा त्यांचा पहिला कट असतो. तरिही चळवळी, नेते वाढतच राहिले तर त्यांच्यावर हल्ले करणे, नेतृत्वाचे चारित्र्यहनन करणे, नेत्यांच्या हत्येच्या सुपार्‍या देणे, हत्त्या करणे, ही दुसरी पायरी असते. तरिही ते संपले नाहीत, उलट वाढतच राहिले, समाजमान्य होत गेले तर त्यांचे अपहरण करणे ही तिसरी पायरी असते. या अवस्थेत सध्या शिवराय, बाबासाहेब आदी महापुरूष सापडलेले आहेत. अर्थात अपहरण करण्यामागे स्विकारण्याचा प्रामाणिक हेतू नसतो. त्यांच्या क्रांतिकारक विचारात भेसळ करून ते विकृत करीत राहणे हे मुख्य अभियान असते. मधूनमधून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना मानणारे लोक झोपलेत की जागे आहेत याचाही अंदाज घेतला जातो. तो अंगलट आला तर प्रसंगी माघार घेऊन तह केला जातो. विकृतीकरण मात्र जारीच राहते.  २०१४ पासून या शक्तींनी पुन्हा उचल खाल्लेली आहे. केंद्रात आणि राज्यात नरेंद्र-देवेंद्रांची सत्ता आल्याबरोबर या आमराईतील रेशीमकिड्यांना रसद मिळू लागली. हे घाशीराम कोतवाल पुन्हा मस्तवाल झाले.

अधिक वाचा  सातासमुद्र पार ‘जय भीम’ नारा! महामानवाला अभिवादन! किली पाॅलचे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

जोतीरावांचे अनुयायी, मित्र आणि सत्यशोधक विद्वान कृष्णाजी अर्जून केळुसकर यांनी १९०६ साली सुमारे ६०० पृष्ठांचे प्रदीर्घ असे मौलिक शिवचरित्र लिहिले. केळुसकर मराठा कुणबी असल्याने शतकानंतरही हे पुस्तक दुर्लक्षित आहे. शिवचरित्राच्या लेखन-प्रकाशनाने केळुसकारांचे हातच पोळले होते. या पुस्तकासाठी व याच्या इंग्रजी अनुवादासाठी [ अनु. एन.एस. ताकाखाव ] त्यांनी बॅंकेचे कर्ज काढले. ग्रंथशत्रू असलेल्या बहुजनांनी या पुस्तकाकडे ढुंकुनही बघितले नाही. तोवर शिवराय मध्यमवर्गीयांचे डार्लिंग वा रोजगाराचे साधन झालेले नव्हते. ते सेलिब्रीटीही झालेले नव्हते. तसे ते फार नंतर झाले. त्यामुळे मध्यमवर्गीयांनीही हे पुस्तक घेतले नाही. केळुसकर गुरूजी आपले विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्यासोबत डोक्यावर या पुस्तकाचे गठ्ठे घेत घरोघरी फिरून शिवचरित्र घ्या हो शिवचरित्र घ्या! अशी बहुजनांना विनवणी करायचे. कोणाही मराठा, कुणबी, माळी, आगरी, भंडारी बहुजनांना हे पुस्तक खरेदी करावेसे वाटले नाही. परिणामी केळुसकरांवरील कर्जाचा बोजा वाढतच गेला. बॅंकेच्या जप्तीच्या नोटीसा यायला लागल्या. केळुसकर हवालदिल झाले. अश्रू गाळू लागले. कुठून आपल्याला ही अवदसा आठवली असे त्यांना झाले.

ते शाहू महाराजांकडे गेले. महाराजांनी शिवचरित्राच्या २५० प्रती तात्काळ विकत घेतल्या. कर्ज फेडण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले. आपण लग्नाला बडोद्याला चाललोय, आल्यावर भेटा, असे महाराज म्हणाले. पण महाराज मुंबईत अचानक, अकाली वारले. केळुसकर ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे गेले. आपण लंडनला तातडीने निघालोय, आल्यावर भेटा, नक्की मदत करू असे आश्वासन माधवराव शिंदे यांनी दिले. पण शिंद्यांचे लंडनमध्येच निधन झाले. केळुसकर इंदूरला तुकोजीराव होळकर महाराजांकडे गेले. तुकोजीराव पडले धनगर राजे.आजूबाजूला डझनावारी मराठा संस्थानिक असताना ज्याअर्थी केळुसकर गुरूजी आपल्याकडे आलेत त्याअर्थी  मदत करायला हवी म्हणून त्यांनी २५ हजार रूपये तात्काळ दिले आणि केळुसकर कर्जमुक्त झाले. केळुसकरांनी पुस्तकाच्या ५०० प्रती होळकर महाराजांना भेट पाठवल्या. पण त्या मिळायच्या आतच होळकरांची गादी ब्रिटीशांनी खालसा केलेली होती. अशी झाली केळुसकरांच्या शिवचरित्राची फरपट.

अर्थात आजही बहुजनांना ना केळुसकर माहित आहेत, ना होळकर, ना शिवचरित्र! उत्तम चालूय!
सदैव धार्मिक गुंगीत असलेले बहुजन आणि स्पर्धाभावनेने पछाडलेले पुरोगामी हे सनातन्यांच्या बुद्धीभेदाला पुन्हापुन्हा बळी पडतात. कावेबाज प्रतिगामी सनातनी व्यवस्थेकडून विकृतीकरणाचे हे उद्योग चिवटपणे चालूच राहतात. बहुजन पुरोगामी सोयर्‍यांनो, अशाच गाढ झोपा काढा. तुम्हाला गुंगीची, झोपेची नितांत गरज आहे. तुम्हारा कुछ नही होनेवाला. तुम्ही गुलामीतच सडणार. तुमची तीच लायकी आहे. तुमची झोप हीच जोतीरावांना जयंतीनिमित्तची खरी आदरांजली असेल!

प्रा. हरी नरके, ०७/०४/२०२०