देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउनच्या निर्णयाच काय होणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही असाच निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे. ३० एप्रिलपर्यंत ओडिशामध्ये लॉकडाउन लागू असणार आहे.
करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन घोषित केला होता. लॉकडाउनला १४ दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाउनच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती करोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगांना, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य करण्यात आलेलं नाही. लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच ओडिशा सरकारनं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याची घोषणा केली ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन असणार आहे. विशेष म्हणजे १७ जूनपर्यंत ओडिशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये, असं त्यांनी म्हटलं.

अधिक वाचा  बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न