मुंबई: करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा व निर्णायक टप्पा सुरू झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा ज्यांना स्वत:च्या प्रकृतीबद्दल संशय आहे त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, करोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढं यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
‘राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैवं आहे. पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही, मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी अशा करोनाविरुद्धच्या यंत्रणेतील घटकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे. हे चिंताजनक आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणं आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी घरात थांबणं, संशयित व्यक्तींनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हाच प्रभावी मार्ग असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली असली तरी त्यावर नंतरच्या काळात मात करता येईल, परंतु आता करोनाचा लढा हा एकजुटीनंच लढला पाहिजे. ही लढाई सर्वांची आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक या लढ्यात एकजुटीनं उतरले आहेत ही बाब बळ देणारी आहे. राज्यातल्या, देशातल्या जनतेची एकजूट व करोनाविरुद्ध लढण्याचा निर्धारच आपल्याला यश मिळवून देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी ; डॉक्टर काय म्हणाले ?