देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव लक्षात घेता बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल याची शाश्वती नाही. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आशिया चषकाऐवजी आयपीएल स्पर्धा खेळवता येईल का या प्रयत्नात आहे. तर काही अधिकाऱ्यांच्या मतानुसार यंदाचा हंगाम रद्द होऊ शकतो. मात्र चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भरवशाचा खेळाडू सुरेश रैनाने सध्याच्या खडतर परिस्थितीत लोकांचा जीव वाचवणं हे अधिक महत्वाचं आहे, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं असं म्हटलं आहे.
“सध्याच्या घडीला लोकांचा जीव वाचवणं अधिक महत्वाचं आहे, आयपीएल नंतर खेळवलं जाऊ शकतं. आपण सर्वांनी सरकारने दिलेल्या सूचना पाळणं गरजेचं आहे, लॉकडाऊनचे नियम मोडले तर याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. ज्यावेळी परिस्थिती नियंत्रणात येईल, त्यावेळी आयपीएलचा विचार करता येईल. सध्या अनेक लोकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे”, सुरेश रैना पीटीआयशी बोलत होता.
सुरेश रैना सध्या घरात आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे. रैनाच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. “मी सध्या घरात आराम करतोय, जेवणं करणं..मुलांसोबत वेळ घालवणं…क्रिकेट सोडूनही आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं.” अनेक आजी-माजी खेळाडू, संघमालक यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम खेळवला जावा असं म्हटलं आहे. मात्र असं असलं तरीही प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचं भवितव्य नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.