नवी दिल्ली : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा भारतात घट्ट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होणार का, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे, लॉकडाऊनमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा रंगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन कसा आणि कधी संपवता येईल, याबाबतचा मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपशी संबंधित आर.के. मिश्र यांनी लॉकडाऊन संपवण्यासाठीचा मार्ग सांगितला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधित भाष्य केलं आहे.
‘उद्योग, राजकीय नेते, राजकीय अभ्यासक, विचारवंत आणि पॉलिसी मेकर्स अशा वेगवेगळ्या समुहातील लोकांशी केलेल्या चर्चेनंतर लॉकडाऊन संपवण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ द्यावा लागेल, असा विचार समोर आला आहे,’ असं आर. के. मिश्र यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
1. आयटी आणि आर्थिक सेवा देणाऱ्या संस्था
या संस्थांमध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर पहिल्या आठवड्यात फक्त 25 %, दुसऱ्या आठवड्यात 50%, तिसऱ्या आठवड्यात 75% आणि चौथ्या आठवड्यात 100% अशी कामगारांची उपस्थिती असेल. कामगारांची पूर्ण संख्या होईपर्यंत इतर लोक घरून काम करतील.
2. उद्योग आणि कारखाने – अन्न व आवश्यक वस्तू
हे सर्व पूर्ण क्षमतेने पहिल्या आठवड्यातच सुरू व्हावं, जर ते आता बंद असेल तर…
3. अत्यावश्यक नसलेल्या वस्तू
साप्ताहिक अनावश्यक प्रक्रियेचे 4 आठवड्यांनंतर अनुसरण करा आणि संपूर्ण शक्तीशिवाय ऑपरेट करण्यास सक्षम असलेल्या मशीन / प्लांटपासून प्रारंभ करा
4. सार्वजनिक वाहतूक
सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल्यास सोशल डिस्टन्सिंग ठेवणं अशक्य आहे, त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतरही ही वाहतूक बंद ठेवावी
5. खाजगी वाहतूक
कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी ज्या सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता असते ती खाजगी वाहतूक शक्यत असते, त्यामुळे ही सुरू करण्यात यावी.
6. वस्तू वाहतूक
वस्तूंच्या वाहतुकीला सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांसह परवानगी देण्यात यावी.
7. ई-कॉमर्स
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वस्तूंची मागणी आणि पुरवठा करण्यासाठी सेवा सुरू करण्यात यावी.
8. शाळा, मॉल आणि चित्रपटगृह
सार्वजनिक वाहतुकीप्रमाणेच अशा ठिकाणी कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतरही 4 आठवड्यांसाठी शाळा, मॉल आणि चित्रपटगृह बंद ठेवावीत
दरम्यान, भाजप संबंधित आर. के. मिश्र यांनी सरकारला लॉकडाऊन काढण्यासाठी हा पर्याय सुचवला असला तरीही मोदी सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन काढण्याबाबत आगामी काळात सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहावं लागेल.

अधिक वाचा  ‘आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाहीय…’; मॅक्सवेलने घेतला ब्रेक, त्यामागचं कारणही सांगितलं!