करोनामुळे आरोग्य आणि पोलीस विभागावर प्रचंड ताण आलेला आहे. दोन्ही विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि परिचारिकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्य मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर याची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह अर्थ, आरोग्य आणि उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील पोलीस दल करोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा करोनामुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस विभागांना मार्च महिन्याचे उर्वरित वेतन प्राधान्यानं देण्यात यावं, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
“करोनाविरुद्धच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरुच; ‘या’ जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखा मांडला