नवी दिल्ली: देशात करोना विषाणूच्या संसर्गाचा वेग आता दुप्पट झाला आहे. काल मंगळवारी करोनाची लागण झालेले ३१५ नवे रुग्ण आढळले. या बरोबरच देशात करोनाग्रस्तांची संख्या १६०० हून अधिक झाली आहे. मंगळवारी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले. काल महाराष्ट्रात ८२, तर तामिळनाडूत ५७ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २३ नवे रुग्ण आढळले. या पूर्वी सोमवारी देशात २२७ नवे रुग्ण आढळले होते. सोमवारपर्यंत ही संख्या १३४७ इतकी होती. दरम्यान, या आजाराचा सामुदायिक प्रसार अजून सुरू झाला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
३० जानेवारीला आढळला पहिला रुग्ण
भारतात करोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी या दिवशी आढळला होता. त्यानंतर केवळ दोन महिन्यांच्या काळात रुग्णांची संख्या १५०० च्या वर गेली. १४ मार्चनंतर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली.
१४ मार्चला १००, ३१ मार्चला १६१८ रुग्ण
करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे हे या वरून स्पष्ट होत आहे. १४ मार्च या दिवशी करोना रुग्णांची संख्या केवळ १०० इतकी होती. तर पुढील १५ दिवसांमध्ये म्हणजेच ३१ मार्चपर्यंत ही संख्या १६०० पर्यंत गेली.
करोना विषाणूने भारतात आता गती पकडली असून हे गेल्या तीन दिवसांमधील आकडेवारीवरून स्पष्ट होते. एकूण रुग्णांच्या ४० टक्के रुग्ण (६२६) या फक्त तीन दिवसांमध्ये आढळले आहेत. नवे रुग्ण आढळण्याबरोबरच मृतांच्या संख्येतही जलदगतीने वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत देशात ५२ मृत्यू झाले आहेत.सर्वाधिक रुग्णांसह सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत.
तबलीघी जमातीच्या कार्यक्रमानंतर दिल्लीतील स्थिती बिघडली आहे. दिल्लीत काल मंगळवारी २३ नवे रुग्ण आढळले. यांमध्ये मरकझशी संबंधित रुग्ण नव्हता. दिल्लीत जमातीच्या मुख्यालयात १ ते १५ मार्चदरम्यान मरकझमध्ये २००० लोक होते. रविवारपासून आतापर्यंत १५४८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी ४४१ लोकांमध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत.