मुंबई: इटली, अमेरिका, स्पेनमध्ये करोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील करोना बळींपासून धडा घ्या. आता तरी शहाणे व्हा. बेजबाबदारपणे वागू नका आणि घरात बसून सरकारला सहकार्य करा, असं आवाहन करतानाच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात काही लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रेस नोट काढून हा इशारा दिला आहे. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करा. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्या, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले आहे. राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजीखरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळेबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे असे वाटते. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं त्यांनी आभार मानले आहेत.

अधिक वाचा  छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, जवानांकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा