अकोले: करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्येही काही लोक अनावश्यक घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अकोले तालुक्यात तर तंबाखू पुडी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन सरकारी यंत्रणांकडून, तसंच पोलिसांकडून केलं जात आहे. मात्र, शहरी भागांसह ग्रामीण भागातील काही नागरिक पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रसंगी कारवाई केली जात आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथे कोल्हार घोटी येथे एका वेगळ्याच कारणासाठी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे तंबाखू आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्याविरोधात राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील सोमनाथ पोटकुले (वय २१) आणि संतोष भालेराव (वय २२, राहणार राजूर) हे दोघे रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून राजूर पोलीस ठाण्यालगतच्या कोल्हार घोटी रस्त्यावर तोंडावर मास्क न लावता विनाकारण फिरत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी खिशातून गाय छाप पुडी काढत आपण तंबाखूची पुडी आणण्यासाठी आलो होतो असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेत, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरोधात लढण्यास ठाकरे गटातील बड्यांचा नकार, आता आयात उमेदवार देण्याची वेळ