मुंबई: महाराष्ट्रात अभूतपूर्व अशा लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. करोनाचे संकट परतवून लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. उद्या २३ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन असणार आहे. राज्यात यासोबतच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. गरज पडल्यास ३१ मार्चच्या नंतरही लॉकडाऊनची मुदत वाढवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार म्हणजे नेमके काय होणार, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असेल. या लॉकडाऊनदरम्यान नेमक्या कोणत्या सेवा सुरू राहणार आणि कोणत्या बंद राहणार, याबाबत सरकारच्या आदेशात विस्तृत तपशील देण्यात आला आहे. त्याचा हा वेध…
मुंबईतील लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत राहणार बंद
वाहतूक व्यवस्था:
मुंबई उपनगरीय लोकल, राज्यात अन्यत्र धावणाऱ्या सर्व प्रकारच्या रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेस पूर्णपणे बंद राहणार आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठी शहरांतर्गत बससेवा मात्र सुरू राहील. या सेवांत कार्यरत असणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. आज मध्यरात्रीपासून जगभरातून येणाऱ्या विमानांनाही महाराष्ट्रात प्रवेश बंद केला आहे.
जीवनावश्यक वस्तू:
वैद्यकीय सेवा देणारी रुग्णालये, औषध दुकाने, दूधविक्री केंद्रे, भाजीपाला, अन्न धान्याची दुकाने (किराणा दुकाने) सुरू राहणार आहेत. अन्नधान्य व भाजीपाल्याची वाहतूकही सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा राज्यात आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका, असे सरकारने स्पष्ट केले.
बँका, वित्तीय संस्था:
करोना संकटात आर्थिक कोंडी उद्भवू नये म्हणून बँका तसेच शेअर बाजारसारख्या वित्तीय संस्था सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यांचे कामकाज नियमितपणे सुरू राहील, असे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संख्येत कपात करण्यात आली आहे. आता केवळ ५ टक्के कर्मचारीच कार्यालयांत उपस्थित राहतील.
जमावबंदी:
मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील सर्व नागरी भागांत आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.