नवी दिल्ली : करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘सार्क’ (SAARC) देशांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. बांग्लादेश, मालदीव, श्रीलंका, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या ‘सार्क’मध्ये समावेश असलेल्या सात देशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेत संवाद साधण्याची संधी घेतली. यावेळी, ‘तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र’ असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. या महत्त्वाच्या बैठकीत पाकिस्तानच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. चर्चेत सहभागी होताना पाकिस्तानचे आरोग्य मंत्री डॉ. जफर मिर्झा यांनी पाकिस्तान सरकारकडून घेतली जाणारी काळजी आणि यश समोर मांडलं. यावेळी त्यांनी इम्रान खान सरकारची पाठही थोपटली. पाक करोनाला रोखण्यासाटी यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी, जागतिक आरोग्य संघटनेनं पाकिस्तानचं कौतुक केल्याचंही त्यांनी म्हटलं. पंरतु, यावेळी पाकिस्तानचा खुजेपणा उघडपणे जगासमोर आला. करोनासारख्या कठीण आणि घातक विषयावर बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी नरेंद्र मोदींचे आभार मानणं तर सोडाच पण त्यांचं नावही उच्चारलं नाही उलट या बैठकीत त्यांनी पाकिस्तान आणि चीन सरकारचं जोरदार कौतुक केलं.
जफर मिर्झा : पाकिस्तानचे आरोग्य मंत्री
‘जगभरात जवळपास दीड लाख लोक करोना संक्रमित आहेत तर ५८३३ जणांचा मृत्यू करोनामुळे झालाय. १३८ देश करोनाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे कोणताही देश याविरुद्ध पावलं उचलजफर मिर्झा, पाकिस्तानचे आरोग्य मंत्रीण्यापासून मागे राहू शकत नाही’ असं म्हणत त्यांनी आपल्या संभाषणाला सुरुवात केली.
दक्षिण आशियाला प्रभावित करणाऱ्या कोविड १९ चा धोक्यामुळे पाकिस्तानलही चिंता आहे. अतिशय कठिण अशा प्रसंगांसाठीही आपल्याला तयार राहावं लागेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. ‘पाकिस्तान कोविड-१९ च्या फैलाव प्रतिबंधीत करण्यासाठी आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय. जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) याबद्दल कौतुक केलंय’, असं म्हणत सार्कच्या बैठकीत त्यांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.
काश्मीरचा मुद्दा उकरला
करोनाविरुद्ध लढण्यासाठी सुरू असलेल्या तयारीवर खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांचं लक्ष आहे. सीमेवर सील करणं असो किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर नियंत्रण किंवा आयसोलेशन वॉर्ड बनवणं असे अनेक पावलं पाकिस्तान सरकारनं उचलली आहेत. देशातील केवळ तीन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आलीय, अशीही माहिती त्यांनी दिलीय.
यावेळी, त्यांनी काश्मीरचाही मुद्दा काढला. ‘जम्मू-काश्मीरमध्येही कोविड १९ चा शिरकाव झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आरोग्याशी निगडीत आणिबाणीच समोर आल्यानं या भागातील बंदी उठवणं आवश्यक आहे’ असंही पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी यावेळी म्हटलं.
रविवारी सायंकाळी ५.०० वाजता ही कॉन्फरन्स ठरल्या वेळेनुसार सुरू झाली होती. पंतप्रधान मोदींनी या बैठकीचं नेतृत्व करत इतर सदस्य देशांनाही त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवलाय. इतकंच नाही तर भारताकडून या फंडसाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली. भारतानं उचललेल्या या पावलाबद्दल पाकिस्तान सोडून इतर देशांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. परंतु, पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मिर्झा यांनी ‘ऑल वेदर फ्रेंड’ असणाऱ्या चीनचं जोरदार कौतुक केलं. चीनचे प्रयत्न आणि अनुभवातून शिकण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलं.