मुंबई: राज्यातील, तसेच देशातील काही खासगी बँकांमधील घोटाळे उघडकीस आल्यानंतर आणि त्यात हजारो खातेदारांचे आणि सार्वजनिक संस्थांचे पैसे अडकल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारनं खबरदारी म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.
सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे आदींनी बँकेचे सर्व व्यवहार राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातूनच करावेत, असा निर्णय सरकारने आज घेतला. याआधी खासगी किंवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा निधी (वेतन, भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडलेली खाती १ एप्रिलपासून बंद करून, केवळ राष्ट्रीय बँकांमध्येत खाती उघडावीत, असे आदेशात म्हटले आहे.
निवृत्ती वेतनधारकांना सरकारचं हे आवाहन
निवृत्ती वेतनधारकांना राज्य सरकारनं आवाहन केलं आहे. सोयीचं पडावं म्हणून त्यांची बँक खाती खासगी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली होती. त्यामुळं सरकारच्या निर्णयानुसार आता ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात यावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. सार्वजनिक उपक्रम, महामंडळांनी गुंतवणूकही राष्ट्रीय बँकांमध्येच करावी, असे आदेशही सरकारने दिले आहेत.