पुण्यानंतर मुंबईमध्येही दोन जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे लक्षात येताच करोनावर उपलब्ध असलेल्या औषध तसेच लसीच्या संदर्भातही चर्चा सुरू झाली. अद्याप संशोधन सुरू असल्याने ठोस औषधांची उपलब्धता नाही. मात्र जीनवशैलीशी निगडित असलेल्या आजारांप्रमाणे संसर्गजन्य आजारांच्या औषधांमधील संशोधनाची गती वाढली आहे, याकडे संशोधनक्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
आयसीएमआरच्या राष्ट्रीय सदस्य डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी भारतामध्ये अनेक संस्था या संशोधनाच्या आजारावर कार्यरत असल्याचे सांगितले. कालाआजार, मलेरिया तसेच स्त्री पुरुषांच्या प्रजनन आरोग्य आणि त्यांमध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या संसर्गांसंदर्भातील अभ्यास, एचआयव्हीसारख्या आजारांसंदर्भातही भारतामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन झाले आहे. करोनाच्या संदर्भात विषाणू लक्षणे दाखवण्यापूर्वीच इतरांना संसर्ग देतो, त्यामुळे त्यावर औषध तसेच वैद्यकीय उपाय शोधण्याचे आव्हान मोठे आहे. मात्र, त्यासंदर्भात सातत्याने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संसर्गित देशातून प्रवास करून भारतामध्ये आले आहे त्यांनी स्वतःच्या घरामध्ये १४ दिवसांपर्यंत राहावे, खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस सामाजिक संपर्क टाळावा, असेही त्या म्हणाल्या.
मागील दहा वर्षांत वाढलेली लोकसंख्या, वेगाने पसरणारे संसर्गजन्य आजार, त्यांचे बदलते स्वरूप अशी वेगवेगळ्या पातळ्यांवर आव्हाने आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये जीवनशैलीशी निगडित असलेल्या आजारांसोबत संसर्गजन्य आजारांचा मुकाबलाही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येणार आहे.
साथीच्या आजारांमध्ये करण्यात येणारी आर्थिक गुंतवणूक ही इतर आजारांच्या तुलनेमध्ये कमी आहे. मात्र, केंद्रसरकाकडून टीबीसारख्या औषधांच्या संशोधनावर भर दिला जात आहे, कारण २०२५ पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यासाठी देशविदेशातून मिळणारा निधीही मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आरोग्य विविध प्रकल्पांसाठी वापरण्यात येत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. औषध कंपन्यासह इतर आरोग्याशी संबधित संस्था याविषयावर काम करत असतात, मात्र त्याची माहिती सर्वसामान्यांना नसते, असे ते म्हणाले. औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी असणारे रुग्ण व यंत्रणा यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका पार पाडणारे एस. एन. अय्यर यांनी यांनी ‘निपाह’चा सामना करण्यामध्ये विकसित केलेल्या चाचणीमध्ये मिळालेले यश महत्त्वाचे होते. त्यामुळे संशोधनाच्या पातळीवर आपण अग्रेसर आहोत, करोनाचा प्रादूर्भाव वाढण्यापूर्वी त्यासंदर्भात चाचण्या वा औषध विकसित करू शकू, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  येथे आलो याचा अर्थ सर्व काही स्वच्छ…., “जाऊ द्या, एकदा नाही म्हणालो तरी.”, हा प्रश्न विचारताच भुजबळ चिडले