राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांच्यावर टीका करताना ठाणे जिल्ह्य़ात त्यांना पक्ष संपवला असा आरोप केला होता. तसंच नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. तर गणेश नाईक यांनीही त्यावर प्रत्युत्तर देत ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. यावर पुन्हा एकदा आव्हाड यांनी टीका केली असून आता आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा, असं म्हटलं आहे.
आव्हाड यांनी ट्विटरवरून नाईक यांच्यावर निशाणा साधला. “मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजून तरी मी शंभर वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा,” असं म्हणत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीकेचा बाण सोडला.
मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजूनतर मी शंभरवेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे.
काय म्हणाले होते आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचं म्हणत त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणलं होतं. मात्र पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले नाईक?
“कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असं गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचंही ते म्हणाले. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितलं होतं, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असं यावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी उत्तर दिलं असून “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं.

अधिक वाचा  झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!