ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते व भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी रोजी त्यांना तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम एन नागराज याबाबत माहिती देताना म्हणाले, आम्ही वारीस पठाण यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. २९ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून, त्यांना आपले म्हणने मांडण्यास सांगण्यात आले आहे.
वारीस पठाण यांनी कर्नाटकमधील गुलबर्गा येथील सभेत बोलताना, “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा“ असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. कलबुर्गी पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंद करण्यात आला. तसेच, वारीस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांचा शिरच्छेद करा, ही कृती करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ अशी घोषणा हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या मुस्लीम संघटनेकडूनही केली गेली. वारीस पठाण देशद्रोही आहेत असं हक-ए-हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटलं आहे.
या अगोदर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तोपर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.
तर, माझं ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आणि मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केलं जातं आहे, असं वारीस पठाण यांनी याप्रकरणी माध्यमांसमोर आपली बाजू मांडतांना सांगितलेलं आहे. १०० कोटी भारतीयांच्या विरोधात नाही तर १५ कोटी मुस्लीम हे १०० नेत्यांच्या विरोधात आहेत, असं मी बोललो होतो. ते १०० लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा यांच्यातले आहेत. काही पत्रकारही आहेत, असही वारीस पठाण म्हणालेले आहेत.

अधिक वाचा  वाल्मिक कराडवर खरेचं 302 दाखल होईल का? बीडचे एसपी म्हणाले…. त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही