अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई न केल्याने आता अहमदनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटिस बजावली आहे. इंदोरीकर महाराजांवर 15 दिवसांत कारवाई न केल्यास यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी सांगितले आहे.
सम-विषम तारखेच्या वादग्रस्त वक्तव्यावरून इंदोरीकर महाराज अर्थात निवृत्ती देशमुख हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात अनेक संघटनांनी आंदोलन केले होते. गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध समितीने (पीसीपीएनडीटी) इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली होती. त्यावर इंदोरीकर महाराजांनी खुलासा केला होता, ‘मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलंच नाही..मी युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही’. इंदोरीकर यांनी जे उत्तरे दिली आहे तसं नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र, ज्या वर्तमान पत्रात हे छापून आले त्यांनी उत्तर अजून दिले नाही, त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले होते.
मात्र, अंनिसने यावर आक्षेप घेतला असून या कायद्यानुसार 24 तासांत कारवाई करणे अपेक्षित असते. तक्रार देऊनही तक्रारीला कुठलेही उत्तर दिलं नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कमिटी अध्यक्ष प्रदीप मुरंबीकर यांना अनिसच्या समन्वयक रंजना गवांदे यांनी नोटीस दिली आहे 15 दिवसांत कारवाई न केल्यास दोघांच्याही विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात असल्याचे रंजना गावंडे यांनी सांगितले आहे. पीसीपीएनडीटीने पुरावे नसल्याचे सांगत तूर्तास इंदुरीकर महाराज देशमुख यांना दिलासा दिला होता. मात्र अनुच्या भूमिकेमुळे इंदुरकर महाराजच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमकं काय बोलले इंदोरीकर महाराज?
‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशा वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.’