नवी दिल्ली : भारताला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियावर टीका केली जात आहे. विराटने अनेक चुका केल्याचं दिग्गजांनी म्हटलं आहे. यात भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचाही समावेश आहे. कपिल देव यांनी संघ व्यवस्थापनालाच धारेवर धरलं आहे. प्रत्येक सामन्यासाठी नवा संघ का असतो असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
कपिल देव यांनी न्यूझीलंडच्या संघाचे कौतुक केलं. त्यांनी गेल्या तीन एकदिवसीय सामन्यापासून खेळात सातत्य ठेवलं आहे. सामन्यावर गांभीर्याने विचार केला तर हे समजत नाही की संघात इतके बदल कसे करू शकता. जवळपास सगळ्या सामन्यात नवीन संघ दिसतो. संघात कोणाचंही स्थान निश्चित नाही असंही कपिल देव म्हणाले.
संघात कोणाला त्यांच्या जागेवरून भीती वाटत असेल तर त्याचा परिणाम खेळाडूच्या कामगिरीवर होतो. फलंदाजीच्या क्रमात मोठी नावं आहेत. जर तुम्ही दोन्ही डावात मिळून 200 धावा करू शकत नाही तर सामना जिंकू शकत नाही असंही कपिल देव यांनी सांगितलं.
कसोटी संघात केएल राहुलला संधी न दिल्यानं कपिल देव यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका खेळाडुला फॉरमॅटनुसार नाही तर त्याच्या फॉर्मनुसार संघात निवडलं पाहिजे. ते का समजू शकत नाहीत त्यांच्या काळात आणि सध्याच्या काळात फरक असल्याचंही ते म्हणाले.
तुम्ही संघ तयार करता तेव्हा खेळाडूंना विश्वास द्यावा लागतो. अनेक बदल केले जातात याला काहीच अर्थ नाही. व्यवस्थापन फॉरमॅटसाठी स्पेशल खेळाडूंवरच विश्वास ठेवते. केएल राहुल सध्या फॉर्ममध्ये आहे आणि तो संघाबाहेर बसलाय हे समजण्यापलिकडं आहे असं कपिल देव म्हणाले.