मुंबई : विधिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरु झाले. अधिवेशनाला दांडी न मारता हजर राहावे, अशा सूचना महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळात दररोज सभागृहात हजर राहण्याची सूचना वजा तंबी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या आमदारांना अधिवेशनाला दांडी न मारता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणी काहीही म्हणो हे सरकार पडणारी नाही याची शाश्वती मी देतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांनी टोला लगावला आहे.
सोनिया गांधींचे केलं कौतुक
महाविकास आघडीच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केलं आहे. सोनिया गांधी चांगल्या विचारांच्या आहेत. सरकारला अडचण निर्माण होईल, असे कुणीही वक्तव्य करू नये, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना दिली आहे.
ठाकरे सरकार अकरा दिवसांत कोसळेल
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या 11 दिवसांत कोसळले, असं भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे.
भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसांत कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात एकूण घडामोडी पाहता महाराष्ट्रातील सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती झाली आहे. पण मी त्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो, अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का? हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असं वाटतं, असं राणे म्हणाले.
हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्या बाबत फक्त आश्वासनं दिली पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये नाही. फक्त सत्तेसाठी आणि पदासाठी, सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता एकत्र आलेलीही मंडळी आहेत म्हणून हे सरकार कोसळेल, असं भाकीत मी करीत आहे, असा दावाही राणेंनी केला.
नागरिकत्त्व सुधारणा कायद्या संदर्भात सुरुवातीला पाठिंबा राज्यसभेत विरोध पुन्हा पंतप्रधान मोदी यांना भेटल्यानंतर त्यांची भूमिका बदलली हे चांगले झालं. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजपा सेना भविष्यात एकत्र येतील का यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नसून त्यासाठी ज्योतिषाकडे जावा लागेल पण भविष्यात काहीही होऊ शकत अशी समीकरण मीडियातून दिसून येत आहेत पाहूया अकरा दिवसात काय होत ते, असंही राणे म्हणाले.

अधिक वाचा  मंत्रालयात आलेली लॅम्बोर्गिनी कुणाची? महागड्या मालकाच्या काळ्या कारनाम्यांचा…; रोहित पवार नेमकं काय म्हणाले?