लासलगाव : लासलगाव जळीतकांड प्रकरणातील महिलेची मृत्यूसोबत झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान या महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. एक आठवड्याच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक केलेली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर एका महिलेला पेटवण्यात आल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली होती. प्रेमसंबंधातील वादातून या 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची माहिती समोर आली होती. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली होती.
लासलगावच्या याच बसस्थानकावर दुपारी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या पहिल्या पतीचं निधन झालं असून तिने शेजारीच राहणाऱ्या रामेश्वर मधुकर भागवत याच्याशी दोन महिन्यापूर्वीच निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. परंतु, रामेश्वर याचा साखरपुडा नातेसंबंधातीलच मुलीशी झाल्यानं, या दोघांमध्ये वाद सुरू होता.

अधिक वाचा  भाजपाने ‘स्थानिक स्वराज्य संस्था’चे रणशिंग फुंकले; भाजपच्या महाविजय 3.0 अभियान उद्या सुरुवात मिनी मंत्रालयाची मोर्चे बांधणी

सायंकाळी ही महिला आपल्या एका सहकाऱ्या सोबत बसस्थानकात उभी होती. याचवेळी, तेथे रामेश्वर आला आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. त्यातून जवळ असलेले बाटलीतील पेट्रोल दोघांनी आपल्या अंगावर शिंपडून घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यात महिला 67 टक्के भाजली होती. घटनेनंतर बसस्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांनी धाव घेत आग विझवली. त्यानंतर या महिलेला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला मुंबईत हलवण्यात आलं होतं. मात्र या महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला आहे.