हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याची भरबाजारात मंगळुरू जवळील सुरथकल येथे हत्या करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरामध्ये प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सध्या देशातील हिंदू मुस्लिम वाद अत्यंत टोकावर असताना भरबाजारामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या परिसरामध्ये तणाव निर्माण करत असल्याने पोलिसांनी  आजपासून ६ मेपर्यंत संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जुलै २०२२ मध्ये झालेल्या एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याची भरबाजारात हत्या करण्यात आली. त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शुक्रवारपासून ६ मेपर्यंत संपूर्ण शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

अधिक वाचा  पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या वाढले हृदयाचे ठोके, शाहबाज आणि मुनीर भारतापासून बचाव करण्यासाठी मागू लागले भीक

सुहास शेट्टीची हत्या गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील बाजपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढल्यानं पोलिसांनी कलम १६३ अंतर्गत मंगळुरू शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, जाहीर सभा, बैठका, रॅली आणि घोषणाबाजी करणे, तसेच शस्त्र म्हणून वापरात असलेल्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. सुहास शेट्टी हा कथितपणे स्थानिक हिंदू संघटनांशी संबंधित होता, असे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांच्या माहितीनुसार, सुहास शेट्टी हा सुरथकलमध्ये २०२२ मधील मोहम्मद फाजिल याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.

अधिक वाचा  मराठा आरक्षण ‘वैद्यकीय प्रवेश’ साठी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या आदेशाने 24 तासांतच अंमलबजावणी

भरबाजारात हत्या

मंगळुरू शहराच्या बाहेरील बाजपेमधील किन्नीपदावू परिसरात गुरुवारी साडेआठ वाजता शेट्टी याची हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हा आपल्या साथीदारांसह एका कारमधून जात होता. त्याचवेळी अन्य एक कार आणि पिकअप वाहनातून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याला अडवलं. त्यावेळी त्याच्यासोबत पाच साथीदारही होते. किन्नीपदावू येथे ही कार अडवण्यात आली होती. त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी शेट्टीवर हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

तुरुंगातून सुटून आला होता सुहास शेट्टी

अधिक वाचा  शिवकालीन युद्ध कला दानपट्टा सादरीकरणाने ‘शिवतीर्थ फाऊंडेशन’ची छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पोलिसांच्या माहितीनुसार, शेट्टी काही दिवसांपूर्वीच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता. शेट्टीच्या हत्येनंतर शेकडोंचा जमाव रुग्णालयाबाहेर जमा झाला होता. विविध संघटनांशी कथितरित्या संबंध असल्याच्या कारणातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.

ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर व्यक्त करण्यात आला आहे. शेट्टीच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.