मंत्रिमंडळात समावेश केला नसल्याने छगन भुजबळ नाराज आहे. त्यांनी उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.ते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विविध आरोपांमुळे धनंजय मुंडे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे अडचणीत येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंसह छगन भुजबळ यांच्यावर मोठी जबाबादरी दिली आहे.
पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कोअर कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय तसेच जनविकासाच्या योजनांची अंमलबजावणी यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची एक कोअर कमेटी स्थापन केली आहे.
या कमिटीमध्ये एकूण सात जणांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा या कमेटीत समावेश केला आहे.
अध्यक्ष तटकरे यांनी या कोअर कमेटीचे पत्र प्रसिद्ध केले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटनेची बांधणी, त्यासाठी आखावे लागणारे कार्यक्रम, धोरणांची आखणी, अंमलबजावणी करणे हा या कोअर टीमचा महत्त्वाचा उद्देश असल्याचे तटकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मंत्रिमंडळातील स्थानवरून मोठा वाद सुरू आहे. भुजबळांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यानंतर ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिकला निघून गेले होते. ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढे काय निर्णय घ्यायचा याची चाचपणी त्यांनी केली होती. अधून-मधून ते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करून आपली नाराजी दर्शवत असतात. सोबतच भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष सोडण्याचे संकेतही देत असतात. त्यामुळे भाजपचा जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
दिलीप वळसे पाटलांचा समावेश
धनंजय मुंडे सध्या चांगलेच वादात सापडले आहेत. विरोधकांमार्फत रोज त्यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे त्यांना पालकमंत्री सुद्धा करण्यात आलेले नाही. माजी मंत्री व गडचिरोलीचे नेते धर्मराव बाबा आत्राम हेसुद्धा सुद्धा मंत्रिमंडाळात समावेश झाला नसल्याने नाराज आहेत. अनेक खात्यांचा अनुभव गाठीशी असतानाही वळसे पाटील यांनाही मंत्रिमंडळातून लांबच ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीचे काम या नेत्यांवर सोपवण्यात आले असल्याचे दिसते आहे.