उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु होती ती अखेर खरी ठरली आहे. कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी कुठल्या पक्षात प्रवेश करणार? ते अखेर निश्चित झालं आहे. ठाण्यात उद्या दुपारी 3 वाजता ते शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा शिवसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु आहेत. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. ते पक्ष सोडणार असून ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.
आता राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समजतय. उद्या दुपारी 3 वाजता राजन साळवी ठाण्यातील आनंदाश्रमात शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश करतील. 1 वाजता नवी मुंबईतील सिडको भवन इथून हजारों कार्यकर्त्यांता ताफा घेऊन ते ठाण्यात येतील. अडीचवर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. दोन गट तयार झाले. सुरुवातीला 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. पण राजन साळवी हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. त्यांच्यामागे एसीबी चौकशीचा ससेमिराही लागला होता. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजन साळवी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या सातत्याने येऊ लागल्या. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट सुद्घा घेतली.
‘बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं’
नुकताच रत्नागिरीतील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी त्यांना घरचा आहेर दिला. “विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच राजन साळवी यांनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली होती” असा दावा विलास चाळके यांनी केला. “राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याचा, शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न करतात, यामुळे मला असं वाटतं की त्यांना बाहेर पडण्यासाठी फक्त निमित्त हवं होतं. पराभवाचं खापर कोणावर तरी फोडायचं होतं. यामुळे ते पराभवाचं खापर माझ्यावर आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत” असं विलास चाळके म्हणाले.