राज्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची मुळे (जीबीएस) एकाचा सोलापुरात तर आणखी एकाचा संशयित रुग्णाचा पिंपरीमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे. पुण्यासह राज्यातील चार जिल्ह्यात जीबीएसचे रूग्ण आढळले आहेत. नागपूर, सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल (सोमवारी, ता, 27) सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहेत. दरम्यान दूषित पाण्यामुळेच जीबीएस पसरतो हे समोर आलं आहे. अशातच पुण्यात विहिरीतील दूषित पाण्यामुळेच जीबीएस पसरत असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
विहिरीतील दूषित पाण्यामुळेच जीबीएस आरोग्यमंत्री
पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली असून आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल (सोमवारी, ता, 27) दिली आहे. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची गरज आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘बाधित जिल्ह्यांतील भागांत सर्वेक्षण’
जीबीएस आजारावती प्रतिबंध घालण्यासाठी राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला तातडीने भेट देऊन बाधित जिल्ह्यातील भागांत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांचे शौच आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. त्यातील काही नमुन्यांमध्ये नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे बाधित जिल्ह्यातील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांनाही देण्यात आल्या आहेत.