बीड जिल्ह्यातल्या मस्सोजगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची एन्ट्री झाली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले होते, त्याच्यावर आता मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड संदर्भात तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि या मागे दिंडोरीच्या आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ऊर्फ गरुमाऊली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर आम्हाला अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे की, या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोन दिवस दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
मगाच्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते, त्या प्रकरणात वाल्मिक कराड यानं मध्यस्थी केली, त्याचेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात अश्रय देण्यात आला, असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. तसेच त्यांनी दिंडोरी आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप देखील केले आहेत. त्यांच्या या आरोपाला आता अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमंक काय म्हणाले आबासाहेब मोरे?
त्यांनी जो कालावधी सांगितला, त्या कालावधीत इथ दत्तजयंती सप्ताह सुरू होता, या काळात इथे लाखो भाविक येतात. ते गर्दीत दर्शनाला येवून गेले.मात्र आम्हाला त्याची कल्पना नाही. सीआयडीची टीम इथ येवून गेली, आम्ही त्यांना आश्रमातील CCTV फुटेज दिलं आहे. ते भाविक म्हणून येवून गेले. मात्र आम्हाला त्याची माहिती नाही मात्र त्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा आहे. इथे दरबारात मुक्कामाची व्यवस्था नाही.देसाई यांच्या आरोपात तथ्य नाही.
दरम्यान तृप्ती देसाई यांनी गुरुमाऊलींवर लैंगिक शोषणाचे आरोप देखील केले आहेत, याला देखील आबासाहेब मोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तृप्ती देसाई यांचे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. या आरोपांचे आम्ही खंडन करतो. हे मंदिर आहे, इथ आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो. मागे काही वर्षांपूर्वी एका सेवेकरी व्यक्तीच्या बाबतीत आरोप करण्यात आले. मात्र नंतर तक्रारकर्ते हायकोर्टात खोटे ठरले, त्यांनी माफी देखील मागितली. त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्थ नसल्याचं आबासाहेब मोरे यांनी म्हटलं आहे.