भारतीय महिला क्रिकेट टीमनं वन-डे क्रिकेटच्या इतिहासात नवा इतिहास रचला आहे. आयर्लंड विरुद्ध राजकोटमध्ये सुरु असलेल्या वन-डे मॅचमध्ये भारतीय टीमनं हा रेकॉर्ड रचला. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतानं 5 आऊट 435 रन्स केले. भारतीय महिला टीमची वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विशेष म्हणजे यावेळी महिला टीमनं पुरुषांच्या भारतीय टीमला देखील मागे टाकलं. टीम इंडियाचा वन-डे क्रिकेटमधील सर्वोच्च स्कोअर 5 आऊट 418 हा आहे. 2011 साली वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियानं हा स्कोअर उभा केला होता.

स्मृती, प्रतिकाची सेंच्युरी

टीम इंडियानं कॅप्टन स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या सेंच्युरीच्या जोरावर विक्रमी स्कोअर केला. स्मृती मंधानानं 70 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या महिला खेळाडूनं झळकावलेली ही सर्वात फास्ट सेंच्युरी आहे. स्मृतीनं हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड मोडला. हरमनप्रीतनं मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 87 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली होती.

अधिक वाचा  कॉपीमुक्त 0रुपये खर्च अभियानाचा ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर वापरणार; तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर नेमकं काय.. जाणून घ्या

स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 233 रनची पार्टरनशिप केली. प्रतिकानं 129 बॉलमध्ये 154 रन केले. या खेळीत तिनं 20 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर स्मृतीनं फक्त 80 बॉलमध्ये 12 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीनं 135 रन काढले.

विकेटकिपर-बॅटर रिचा घोषनं 42 बॉलमध्ये 59 तर तेजल हसबनीसनं 25 बॉलमध्ये 28 रन करत टीम इंडियाच्या स्कोअरमध्ये हातभार लावला. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. टीम इंडियानं यापूर्वीच्या दोन्ही वन-डे जिंकत सीरिज जिंकली आहे.