महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर उत्साही वातावरणात पार पडला. यामध्ये मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली.या दिमाखदार सोहळ्यास पीएम नरेंद्र मोदी यांच्यासह 19 राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते. दुसरीकडे या शपथविधी सोहळा पार पडताच आता महायुतीमधील तीन घटक पक्षात आता मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग पाहवयास मिळत आहे. दुसरीकडे सर्वच पक्षात मलईदार खात्यासाठी मोठी रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास 13 दिवसानंतर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. गुरुवारी शपथ विधी सोहळा पार पडल्यानंतर आता महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्र्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात खाते वाटपावरून मोठी चुरस पाहवयास मिळत आहे. त्यामध्ये गृह, अर्थ, नगरविकास, महसूल व जलसंपदा या खात्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह, नगरविकास, महसूल खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही अर्थ, महसूल व नगरविकास या दोन्ही खाते मिळावेत, अशी मागणी केली आहे. परंतु भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह मंत्रीपद सोडण्यास तयार नाही. गृहमंत्रिपद स्वतःकडेच भाजप ठेवणार असल्याचे समजते. त्यामुळे या खात्यावरून सध्या तर रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
भाजपमध्ये मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची पुन्हा चर्चा आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याशिवाय महायुतीमध्ये या वेळेस काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
तीन पक्षातील आमदारांची संख्या पाहता मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. विशेषतः एका-एका जिल्ह्यातून तीन ते चार जण महायतीकडून इच्छुक असल्याने सर्वत्र जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी 11 डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता असल्याने जोरदार रस्सीखेच सुरु आहे.