मुंबई : महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. पण या शपथविधी सोहळ्यात फडणवीस यांच्यासोबत कोण कोण शपथ घेणार याबद्दल सस्पेन्स अजूनही कायम आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला. तसंच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी घोषणाही करण्यात आली. त्यानंतर आता शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पण मंत्रिपदाची शपथ कोण कोण घेणार यावरून अजूनही चर्चा सुरू आहे.
महायुतीत तीन पक्षांच्या नेत्यांवर पक्षांतर्गत मागणी समोर आली आहे. मंत्रिमंडळ शपथविधीत इतर कॅबिनेट मंत्री यांचा समावेश करावा. सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुक यांच्यात नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडे अनेक आमदारांनी नवीनच मागणी केली आहे. गुरुवारी आझाद मैदानावर शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर होतोय, त्यामुळे किमान प्रत्येकी भाजपमधील १० तसंच शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येकी ५-५ असे 20 लोकांचा शपथविधी मागणी केली जात आहे. शपथविधीत जास्त मंत्री शपथ व्हावे यासाठी आज रात्री महायुती नेत्यांत चर्चा करून भाजपा पक्ष श्रेष्ठीना विनंती करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.