पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे २०१४ पासूनच पुण्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे दरवर्षीच्या केंद्राच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी केलेल्या ८१९ कोटी रूपयांच्या तरतुदीमुळे मेट्रोच्या विस्ताराला निश्चितच वेग येईल. मुळा-मुठा नदी पुनर्रुज्जीवन ६९० कोटी निधीमुळे प्रदूषणाला आळा घालता येईल.
पुणे हे एमएसएमई आणि स्टार्टअपचे हब म्हणून विकसित होत असल्याने त्यासाठी केलेल्या तरतुदींच्या पुण्यातील युवकांना लाभ मिळेल. देशात १००० इंडस्ट्रियल ट्रेनिंग संस्था उभारण्यात येणार असून त्यातून तयार होणारे मनुष्यबळ पुण्याला उपयोगी पडणारे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने अर्थसंकल्पातील विद्यार्थ्यांशी संबंधित कर्ज, इंटर्नशीप हेही पुण्यासाठी महत्त्वाचे आहे.
फिल्म इन्स्टिट्यूट, आयआयटीएम, नॅचरोपॅथी संस्था, आधारकर संस्था या संस्थांसाठीही निधीची तरतूद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील ३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या विकासासाठी विशेष निधी दिला जाणार असल्याने त्यात पुण्याचाही समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पात पुणे-मिरज, पुणे-दौंड, पुणे-नगर, पुणे-नाशिक या रेल्वे मार्गांचा समावेश आहे.