मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. जर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यानी दिली. दरम्यान, जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये, त्यांनी खुशाल झोपावं, त्यांनी संरक्षण घ्यावं,असं म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांवर निशाणा साधला.
17 डिसेंबरला आंतरवाली सराटीत सकाळी 9 वाजता बैठक होणार आहे. 12 वाजेपर्यंत सर्वांचा परिचय होईल. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय? त्यावर 12 ते 3 वाजता चर्चा होईल,असे जरांगे पाटील यांनी सांगितलं. अंतरवालीला जिथे सभा झाली होती तिथे बैठक होणार आहे.
मराठ्यांचे आरक्षण ओबीसी आरक्षणात 50 टक्केच्या आत सापडले आहे. मग आम्हाला हेच आरक्षण द्या यावर आम्ही ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आजच नाही पण आम्ही पहील्यापासून सांगतो, क्युरीटी पीटिशन का दाखल करत आहात? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, 17 तारखेला होणाऱ्या बैठकीच्या आमंत्रणाची वाट पाहू नका,सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये या असे जरांगे पाटील म्हणाले.
भुजबळांना अजित पवार आणि फडणवीसांची साथ
देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. छगन भुजबळ हे त्यांचा वापर करुन घेत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत. त्यामुळं मराठा समाजावर अन्याय होत आहे. या कारणामुळं फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील रोष वाढत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळांना फडणवीसांचा वापर करायचा आहे तर अजित पवार यांना बाजूला सारायचे असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळांनी जरुर संरक्षण घ्याव पण त्यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये असे जरांगे पाटील म्हणाले.