मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांचा आणि नेतेमंडळीचा कडाडून विरोध झाला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या सगळया गोष्टींचा विचार करत शरद पवार यांनी निर्णय मागे घेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहिले. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर् टीका केली होती. याला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, “शरद पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे की राज्यातील घडामोडींची बितंबातमी उद्धव ठाकरेंकडे नसे, जी मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव टाकरेंना मुख्यमंत्री केल्यामुळे शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचे कुठे काय घडत आहे याकडे बारीक लक्ष नसे. उद्या काय घडेल याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती जी नव्हती. काय पावलं उचलावी लागतील, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य असायला हवे होते. त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती, असे शरद पवार पुस्तकात म्हणत आहेत.”
पुढे फडणवीस म्हणाले होते की, “एक गोष्ट तर महाराष्ट्रात मला लक्षातच आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा त्याचंही आपल्याला प्रशिक्षण घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा परत घेईन. मग मीच माझ्या जागी परत येईन.”
यावर प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पुस्तक सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण वाचलं तर १०० असे उल्लेख आहेत, ज्यात उद्धव ठाकरेंचं कौतुक आहे. याला ‘सिलेक्टिव्ह अॅम्नेशिया’ असं म्हणतात. तो त्यांना सातत्याने होतो. पूर्ण अभ्यास करायचा नाही. कुणीतरी नोट्स काढून दिलेल्या असतात, तेवढ्या आपल्या वाचून दाखवायच्या. दरवेळी माणूस त्यावर पास होत नाही. पूर्ण पुस्तक वाचायचे असते”, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी फडणविसांना दिला आहे.