लग्नाचं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात एका तरुणाने दोन मुलींसोबत लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. हरिओम मीना नावाच्या सुशिक्षित तरुणाचा दोन बहिणींसोबत असा विवाह झाला की, हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या लग्नाची निमंत्रण पत्रिका छापून ती वितरितही करण्यात आली होती. या अनोख्या लग्नात हरिओमचे संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळी आणि समाजातील लोकही सहभागी झाले होते.
वास्तविक, ही घटना आहे उनियारा उपविभागातील मोरझालाच्या झोपडिया गावातील. इथे राहणाऱ्या हरिओमने सांगितलं की, कुटुंबीय त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. दरम्यान, निवई उपविभागातील सिद्द गावातील रहिवासी बाबूलाल मीना यांची मोठी मुलगी कांता हिच्याशी लग्नासाठी बोलणी सुरू झाली.
यानंतर तरुणाचे कुटुंबीय सिद्रा येथे गेले असता, तरुणी कांताने आपली धाकटी आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बहीण सुमन हिच्याबद्दल खूप आपुलकी असल्याचं सांगत आपल्या मनातील गोष्ट सांगितली. ती म्हणाली, की मी त्याच तरुणाशी लग्न करेल जो आम्हा दोन बहिणींसोबतही विवाह करेल.
हरिओमच्या म्हणण्यानुसार, आधी तो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ही अट ऐकून आश्चर्य वाटलं. पण धाकट्या बहिणीला आयुष्यभर सांभाळायचं आहे, असं कांताने सांगितल्यावर दोन्ही बहिणींचा अतूट स्नेह त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला.
हरिओमच्या कुटुंबीयांनी ५ मे रोजी मोठ्या थाटामाटात हा अनोखा विवाह सोहळा आयोजित केला होता. कार्ड छापून वितरित करण्यात आले. वधू म्हणून दोन्ही बहिणींनी अग्नीच्या साक्षीने हरिओमसोबत लग्नाच्या मंडपात एकत्र सप्तपदी पूर्ण केली. नवविवाहित जोडप्यांना सर्व परंपरांसह घरात प्रवेश देण्यात आला आणि इतर विधी पूर्ण करण्यात आले.
हरिओमने सांगितलं की, तो स्वत: स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तर त्याची पत्नी कांता उर्दूमधून बीएड आहे. कांताची धाकटी बहीण म्हणजेच हरिओमची दुसरी पत्नी सुमन मानसिक दुर्बलतेमुळे केवळ 8वीपर्यंतच शिकू शकली. नवविवाहित वराचं म्हणणं आहे, की तो पत्नींनादेखील अशा प्रकारे ठेवेल की त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख होणार नाही आणि दोघींमधील परस्पर स्नेह कायम राहील.