भाजपला कर्नाटकमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, हे सत्य आहे. जे निवडून आले त्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकमध्ये १९८५ पासून कुठलंच सरकार रिपीट होत नाही. सातत्याने ते बदलत असते. यावेळी तो ट्रेंड तोडू शकू असं आम्हाला वाटत होतं. पण, तो ट्रेंड तोडू शकलो नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना ते म्हणाले, २०१८ साली भाजपच्या १०६ जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला ३६ टक्के मतं होती. आता आम्हाला ३५.६ टक्के आहेत. अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं भाजपची कमी झाली आहेत. परंतु, जागा ४० कमी झाल्या आहेत.
जेडीएसची मतं काँग्रेसकडे गेल्याने विजय
२०१८ मध्ये काँग्रेसला ३८ टक्के मतं होती. जनता दल सेक्युलरला (जेडीएस) १८ टक्के मतं होती. यावेळी जेडीएसची पाच टक्के मतं कमी झाली आहेत. ही जेडीएसची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा विजय मिळाला आहे. भाजपची मतं ही कुठंही कमी झालेली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काही लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकतोय. त्यांना असं वाटतं की ते देशच जिंकले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल बघीतले पाहिजे की, त्यात काय अंतर असते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठं यश
आजच उत्तर प्रदेशच्या लोकल बॉडीचे निकाल आले आहेत. उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. असं म्हणतात की, जे उत्तर प्रदेश जिंकतात तेच देश जिंकतात. उत्तर प्रदेशात भाजप वन साईडेड निवडून आली आहे. त्यामुळे कर्नाटक जिंकून जणू काही देश जिंकल्याचं काही लोकं सांगतात. याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही.
बेगामी शादीमे अब्दुल्ला दिवाना
बेगामी शादीमे अब्दुल्ला दिवाना, असेही काही लोकं मला पाहायला मिळतात. ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये यश नाही. ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये जागाही नाहीत. असेही लोकं नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. हे लोकं जन्मभर दुसऱ्याच्या घरी पोरगा झाला म्हणून खुशी मनवतात. त्यांच्याबद्दल दुसरी काही प्रतिक्रिया देणं हे योग्य वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.