राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या आठवड्यात अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुरुवातीला शरद पवार यांच्या निर्णयांचं स्वागत केलं. पण इतर नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर पाहता त्यांनी सुद्धा शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत, अशी भूमिका घेतली. सलग तीन दिवसांच्या घडामोडींनंतर शरद पवार यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. या सगळ्या घडामोडींनंतर भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर गेले. त्यानंतर ते कर्नाटकातील सीमाभागात प्रचारासाठी गेले. या दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली. “पक्ष एकसंध ठेवण्यासाठी शरद पवारांना कसरत करावी लागतेय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. कसरत पाहता इतर पक्षावर बोलावं की नाही हे पवारांनी ठरवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रव्यापी नाही. त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार यांना खूप लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार काहीही बोलू शकतात. पण मला असं वाटतं की आता त्यांना पक्ष एकसंध ठेवण्यासाठी ज्या कसरती कराव्या लागत आहेत ही कसरत पाहिल्यानंतरच त्यांनी इतर पक्षांबद्दल बोलावं की नाही बोलावं याचा विचार त्यांना केला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचा फौजदाराचा हवालदार केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. त्यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“राष्ट्रवादीने 2014 आणि 2019 ला देखील स्वप्न पाहिले. पण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. कारण राष्ट्रवादी हा पक्ष महाराष्ट्रव्यापी नाही”, अशी टीक देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दरम्यान, “खतांची उपलब्धता मागील वर्षांपेक्षा यावर्षी जास्त आहे. पीक कर्जाकरिता सिबिल अट ठेवता येणार नाही. शेतकऱ्यांना CIBIL मागणाऱ्या बँकांविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.