केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. 40 पर्यटकांनी भरलेली बोट उलटल्याने 21 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी दिलेल्या माहितीनूसार, अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.
अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि NDRF घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन व्हायरल होतं आहेत.
केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तसेच, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत.