जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसबाबत आता काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कोविड संदर्भात मोठी घोषणा करताना डब्ल्यूएचओने सांगितले की, कोविड-19 ही आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही. याबाबतचा निर्णय आपत्कालीन समितीच्या 15 व्या बैठकीत घेण्यात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने शुक्रवारी सांगितले की कोरोनाव्हायरस – ज्याने जगभरात 6.9 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही.
डब्ल्यूएचओने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण होते आणि एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मात्र, तीन वर्षानंतर मृतांचा आकडा 70 लाखांपर्यंत पोहचला असल्याची नोंद झाली आहे. प्रत्यक्षात सुमारे 2 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला असेल असे वाटते.
आणीबाणी संपली.. पण
डब्ल्यूएचओच्या मते, कोविड-19 जागतिक आरोग्य आणीबाणी संपली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोविड-19 हा जागतिक आरोग्यासाठी संपला आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये दर आठवड्याला 100,000 पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचे प्रमाण 24 एप्रिलच्या आठवड्यात 3,500 पेक्षा जास्त झाले आहे.
कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे घेतला निर्णय
डब्ल्यूएचओने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना संसर्गाला वगळ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य संघटनेने सांगितले की कोविडचा इतका मोठा परिणाम झाला की तो शाळेपासून कार्यालयापर्यंत सर्व बंद करावं लागलं. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त झाली.