भोपाळ – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप म्हटल्याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. आता या मुद्द्यावर सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते शिवराज सिंह चौहानही सहभागी झाले आहेत.
त्यांनी कॉंग्रेस पक्ष एक विषकुंभ असून मोदी विष प्राशन करणारे निळकंठ आहेत असे म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष विषाचा कुंभ झाला आहे. ते सतत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विष ओकत असतात. कोणी त्यांना चोराची उपमा देते तर कोणी त्यांना मौत का सौदागर म्हणते.
कोणी साप म्हणते तर कोणी त्यांचा आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख करते. सत्ता गमावल्यामुळे जी अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे हे लोक आता बिथरलेले आहेत. त्यातून ही विषारी वाणी सुरू झाली आहे. मात्र त्यांना एक समजत नाही की मोदी हे निळकंठ आहेत. ते विष प्राशन करून टाकतील, असे चौहान म्हणाले.
कर्नाटकातील कॉंग्रेस नेते सिध्दरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवकुमार या तिघांचा उल्लेख चौहान यांनी एसएमएस असा केला. ज्या प्रकारे एक करप्ट मेसेज मोबाइल खराब करून टाकतो, त्याप्रमाणे कर्नाटकातील हा एसएमएस पूर्ण कर्नाटकला बरबाद करून टाकेल. डबल इंजिनचे सरकारच कर्नाटकला वाचवू शकते असा दावा चौहान यांनी केला.