मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा १ मे, महाराष्ट्र दिनी होण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ‘महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३वा वर्धापनदिन व मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हायला हवी. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा लढा दशकाहून अधिक काळ सुरू आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत आहेत. तसे सबळ वस्तुनिष्ठ माहितीचे पुरावे सादर करण्यात आले. त्यासंदर्भातील सखोल अंतरिम अहवाल महाराष्ट्राने सन २०१३मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुपूर्द केला. सन २०१४मध्ये याचा अंतिम निर्णय त्यावेळेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अडकला,’ असे अजित पवार म्हणाले.
‘महाविकास आघाडीच्या राजवटीत तत्कालीन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या शिष्टमंडळाने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्य सरकारने पाठविलेला प्रा. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल योग्य असून, तो केंद्राने स्वीकारला आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. या संबंधित केंद्राच्या सर्व विभागांनी सकारात्मक अहवाल दिला आहे.
अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळासमोर असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्रदिनी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा जाहीर होईल, यासाठी प्रयत्न करावा,’ असे अजित पवार म्हणाले.