भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये सुरु झाली आहे. या मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे ती १० बेटांना जोडणारा प्रवास करणार आहे. केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. बॅटरीवर चालणारी ही इलेक्ट्रिक हायब्रिड बोट कनेक्टिव्हिटीसाठी महत्वाची मानली जात आहे. ही वॉटर मेट्रो शहरी भागातील एक वेगळ्या पद्धतीची वाहतुक व्यवस्था आहे. पारंपारिक मेट्रोशी तुलनात्मक पातळीवर सोपी आणि आरामदायी अनुभव देते. कोची सारख्या शहरांसाठी हा पाण्यातील प्रवासाचा मार्ग मौल्यवान आहे.
कोची मेट्रो रेल लिमिटेडचे एमडी लोकनाथ बेहेरा यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितलं की, “कोची वॉटर मेट्रो हा खास प्रोजेक्ट असून ही मोठा वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा प्रकल्प आहे. कोची हे शहर अनेक बेटांनी वेढलेलं आहे. यांपैकी १० बेटं हे महत्वाचे असून त्यावरची लोकसंख्याही जास्त आहे. या बेटांवर राहणाऱ्या ज्या लोकांना आपल्या विविध कामांसाठी कायम कोची शहरात यावं लागतं त्यांना या आरामदायी वॉटर मेट्रोची सुविधा अगदी कमी खर्चात वापरता येईल”
वॉटर मेट्रोची खासियत काय?
मेट्रो प्रकल्पाची सुरुवात कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या अंतर्गत आठ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींनी केली जाईल.
केरळ सरकार आणि जर्मन कंपनी KfW या ड्रीम प्रोजेक्ट विकसित करत आहे.
यामध्ये 38 टर्मिनल आणि 78 इलेक्ट्रिक बोटींचा समावेश आहे.
KWM सेवा पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन आणि वायटीला-कक्कनड टर्मिनल्सवरून सुरू होईल.
बोटीच्या प्रवासाची तिकिटं 20 रुपयांपासून सुरू होतात. वारंवार येणाऱ्या प्रवाशांसाठी साप्ताहिक आणि मासिक पास उपलब्ध आहेत.
कोची वन कार्ड वापरून, कोणीही कोची मेट्रो रेल्वे आणि कोची वॉटर मेट्रो या दोन्हींमधून प्रवास करू शकतात. कोची वन अॅप वापरकर्त्यांना डिजिटल पद्धतीनं तिकिटे खरेदी करता येणार आहे.